ताडोबाचे जंगल आणि जगण्यातील आनंद.!
ताडोबाचे जंगल आणि जगण्यातील आनंद.! -- “एखादी व्यक्ती जंगलात गेली व परत आल्यानंतर त्याने काहीच दिसले नाही अशी तक्रार केली, तर ती व्यक्ती केवळ अंधच नाही तर बहिरी पण आहे, तिला गंध जाणवत नाही आणि ती निर्बुद्धही आहे” ... मी. यात आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते, तुम्ही वरील काहीही नसलात तरीही जंगल तुम्हाला थोडेसे लोभी सुद्धा बनवते; हा मुद्दादेखील पुढे समजावून सांगेन. तर हा लेख जंगलांविषयी व ताडोबाविषयीही आहे (कारण यावेळचा दौरा तिकडे होता) त्यामुळे ज्यांना आधीच उबग आल्यासारखा वाटत असेल, ते वाचन थांबवू शकतात (वैधानिक इशारा)! यंदाचा उन्हाळा आपण अनुभवलेला आत्तापर्यंतचा सर्वात भीषण उन्हाळा होता, धडाक्याने सुरू असलेली जंगलतोड, शहरीकरण व खाजगी वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यांची कृपा, त्यातच आपल्या वातानुकूलन यंत्रांमधून बाहेर पडणाऱ्या हवेमुळे थेट आपल्या पर्यावरणावर परिणाम होतो, तरीही हे न स्वीकारण्याइतपत किंवा त्याची दखल न घेण्याइतपत आपण मूर्ख आहोत व त्याची किंमत प्रत्येक सजीवाला मोजावी लागतेय. ताडोबा आधीच उन्हाळ्यातील भीषण उष्णतेसाठी ओळखले जाते, तर चंद्रपूर व त्याच्या आजूबाजूची ब्रह्मपुरीसारखी ग...